Advertisement

 मान्सूनचा जोर वाढला

प्रजापत्र | Tuesday, 30/06/2026
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यात मान्सूनचं (Monsoon) लेट आगमन झालं आहे. जून (June) महिन्याच्या शेवटी मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांमध्ये रिप-रिप पावसाची सुरुवात झाली आहे. माहितीनुसार, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊल पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   तर, मुंबईत पुढील ४ दिवस धुवांधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

   मुंबईत आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, उद्या अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज यलो तर उद्या मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी १०० मिमीहून अधिक पाऊस पडू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.  तर,  ३ ते ४ जुलै रोजी कोकणात काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगली पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.रायगड जिल्ह्याला पुढील ५ दिवस पावसाचा ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला असून, रायगडच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावत शेतकऱ्याला दिलासा दिला आहे.रायगडमध्ये २३ जूनला सुरू झालेल्या पावसाने दोन दिवस दडी मारली होती. मात्र कालपासून पुन्हा पाऊस बरसू लागल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दिवसात शेतीची लावणी सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रायगडमधील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांची पाण्याची चिंता मिटली.जून महिन्याच्या शेवटी पश्चिम उपनगरांच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात मागील दहा मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मध्यरात्री पाऊस झाल्यानंतर सकाळापासून काही भागांमध्ये रिपरिप सुरू आहे. जर हा पाऊल अशाच प्रकारे अधिककाळ सुरू राहिला तर, पश्चिम उपनगराच्या सखल भागात पाणी भरायला सुरुवात होऊ शकते.

 

Advertisement

Advertisement