पुणे : पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला (Lohagad Fort Trek) गेलेल्या एका प्रसिद्ध उद्योजकाच्या मुलाचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला 'मर्डर प्लॅन' होता.
कोट्यधीश कुटुंबातील लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अगरवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केली.अगरवाल बिल्डर्सचे सुपुत्र केतन अगरवाल यांचा साखरपुडा सिया गोयलसोबत झाला होता. नोव्हेंबर महिन्यात जयपूरमधील १४ कोटींच्या भव्य पॅलेसमध्ये हे लग्न होणार होते. वऱ्हाडी मंडळींसाठी दोन विमाने देखील बुक करण्यात आली होती.
एकीकडे लग्नाची थाटामाटात तयारी सुरू असताना, दुसरीकडे सिया तिच्या कॉलेज काळातील प्रियकर चेतन चौधरीसोबत केतनच्या हत्येचा कट रचत होती. केतनला ट्रेकिंगची आवड होती. त्यामुळे आधी विश्वास जिंकण्यासाठी सिया केतनसोबत लोहगडावर ट्रेकिंगला जाऊन आली होती.दरम्यान, केतन आणि सियाचे बाली येथे प्री-वेडिंग शूट ठरले होते. मात्र, केतनशी लग्नच करायचं नसल्यानं सियाने केतनचा पासपोर्ट लपवला, ज्यामुळे मुंबई विमानतळावरून त्यांना बालीचा दौरा रद्द करावा लागला.बाली दौरा रद्द झाल्यानंतर,सियाने केतनसोबत कडाक्याचं भांडण केलं. अखेर सियाचा हट्ट पुरवण्यासाठी आणि तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन पुन्हा लोहगडावर ट्रेकिंगसाठी तयार झाला.कटानुसार प्रियकर चेतन चौधरी देखील लोहगडावर पोहोचला. त्याने स्वतःचा फोन न आणता कामगाराचा फोन आणला होता. ओळख लपवण्यासाठी त्याने हुडी आणि हेडफोन घातले होते. त्यावेळी फोटोसाठी पोज देत असतानाच, सिया आणि चेतनने मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले आणि केतनचा पाय घसरल्याचा बनाव रचला.केतनचा अपघात झाल्याचे भासवून सिया आणि चेतनने सर्व पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांना मोठा सुगावा दिला. या दोघांनी एकमेकांना केलेले संशयास्पद इशारे सीसीटीव्हीत कैद झाले. पोलिसांनी या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी केली असता सिया आणि चेतनने आपला गुन्हा कबूल केला.सियाचं हे कृत्य पाहून केतनने साखरपुड्यानंतर व्यक्त केलेली शंका वडिलांना आठवली आणि आपल्या हातून किती मोठी चूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं. सिया आणि चेतनने रचलेला कट आणि नाहक केतनचा गेलेला जीव, यातून तिघांच्या आयुष्याशी राखरांगोळी झालीच, शिवाय तीन कुटुंबंही उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. यातून परिस्थिती किती चिंताजनक आणि भीतीदायक बनली आहे हे यातून अधोरेखित होतं.

