मुंबई - राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या उमेदवारांवर काँग्रेसने कठोर कारवाई केली आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

