Advertisement

अर्थखाते कसे चालवायचे हे अजितदादांकडून शिका, सुप्रिया सुळेंचा अर्थमंत्र्यांना सल्ला

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत जोरदार भाषण करत मोदी सरकारवर एकच हल्लाबोल केला आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार  यांच्याकडून सल्ला घेण्याचा सणसणीत टोला लगावला आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर करत खासदारांचे ११२ कोटी परस्पर कापले आहे. यावर बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी खणखणीत भाषण केलं.

केंद्रातील आणि महाराष्ट्रातील कॅबिनेटमधील अर्थमंत्र्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. सीतारामन यांनी कोणत्याही खासदाराला न विचारता परस्पर 112 कोटी रुपये काढून घेतले आहे. आता लोकं आम्हाला विचारत आहे खासदार निधी द्या, त्यांना काय सांगायचे, आता अडीच वर्ष काहीच करता येणार नाही, आमचा निधी तर मोदी घेऊन गेले आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

'उलट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने एकाही आमदाराकडून निधी काढून घेतला नाही. राज्यात तर तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक आमदाराला तेही विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या आमदारांना सुद्धा 5 कोटी रुपये दरवर्षी मिळत असतात, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्चित केले आहे. हाच खरा भारताच्या अर्थमंत्री आणि महाराष्ट्रातील अर्थमंत्र्यांमधला फरक आहे. जीएसटीची रक्कम मिळत नसताना सुद्धा राज्य सरकारकडून ही व्यवस्था केली जात आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्र्यांना ठणकावून सांगितले.

शरद पवार यांनी जे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, त्यात त्यांनी कृषी कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करुनच राज्यांनी त्यावर विचार करावा', असे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएसटी करप्रणालीला विरोध केला होता' असंही सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना आठवण करून दिली.

Advertisement

Advertisement