Advertisement

आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही

प्रजापत्र | Saturday, 30/05/2026
बातमी शेअर करा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषण सुरु करण्याआधी मनोज जरांगे यांनी पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माझा संघर्ष प्रामाणिक आहे. सरकार येत राहिल, जात राहिल...मी उपोषणावर ठाम आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. तसेच ड्राफ्टपेक्षा ५८ लाख नोंदी धारकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, हा आदेश काढला पाहिजे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. 

  मराठा समाज मोठा होऊ नये, असा विचार असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कितीही चांगला जीआर काढला तरी त्याला आव्हान दिलं जातं. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला अधिकार आहे, ते कलम कमी करू शकतात, बलिदान देणाऱ्या कुटुंबाचा निधी आणि नोकरीचा विषय आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याचा एक विषय आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.उपोषणाला बसलो तरी शिष्टमंडळ येणार आहे आणि नाही बसलो तरी शिष्टमंडळ येणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे. एकदा याच ठिकाणी आम्ही आमच्या आई-बहि‍णींना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आहे. पुन्हा असा विचार करु नका. पोलीस लाठीचार्जच्या भानगडीत पडू नका. राज्यात तुम्हाला जड जाईल, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि पुन्हा आंदोलन थांबणार नाही, असं इशारा मनोज जरांगेंनी दिला. संवाद करून गोडी बोलाविणे मार्ग काढा. हल्ला करायचा नाही, मराठा शांत आहे. देवेंद्र फडणवीस आता दुसऱ्या वेळी हल्ला करणार नाहीत. तरीही मी बोलून दाखवले, असं मनोज जरांगे म्हणाले.

1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.

2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.

3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 

4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 

5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.

6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 

7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 

8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 

9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 

10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

Advertisement

Advertisement