ठाणे : कल्याण-आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात (Accident) झाला असून अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, ४ प्रवासी गंभीर जखमी आहेत. विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्काँर्पीओ गाडीची धडक बसल्याने हा अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-अहिल्यानगरसाठी सकाळी साडेआठ वाजता ही एसटी निघाली होती. मुरबाड (Thane) तालुक्यातील टोकावडे-वैशाखरे हद्दीत स्कार्पिओ कारसोबत बसची धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले होते.
मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर आज सकाळी भीषण अपघात घडला. एसटी बस आणि स्कॉर्पिओ कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे, त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणारी एसटी बस वैशाखरे येथील वळणावर आली असताना समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओसोबत तिची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चुराडा झाल्याचं व्हिडिओ आणि फोटोंमधून दिसून येते.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

