मुंबई : केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी असून अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी क्षेत्र देशोधडीला लागणार आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटात पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी व्यापारी करार हा मोठा आघात आहे. या करारामुळे भारतातील शेतमालाला भाव मिळणार नाही. ग्रामीण भागातील गरीब, कष्टकऱ्यांसाठी युपीए सरकारने आणलेली मनरेगा ही हक्काची रोजगार देणारी योजनाही भाजपा सरकारने मोडीत काढली आहे.
केंद्रातील सरकारबरोबरच राज्यातील सरकारही शेतकरी विरोधी असून गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणून शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला तीव्र विरोध आहे पण सरकार मात्र या विरोधाकडे कानाडोळा करून त्यांच्या लाडक्या उद्योगपती मित्रासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहे. भाजपा सरकारच्या या जुलमी, अत्याचारी, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून ९ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात येणार आहे.
अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, मनरेगा, शक्तीपीठ महामार्ग या प्रमुख मागण्याबरोबरच आदिवासी विशेष पदभरती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, घरकुल योजना या मागण्यासाठीही हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे या यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी असून प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

