पुणे: दिवाळी सणाचा उत्साह ओसरत असताना राज्यभरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र व ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून या अवकाळी पावसाने विशेषतः नाशिक जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मराठवाड्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असून हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा (Rain Alert) दिला आहे.
विदर्भात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस महिनाअखेरपर्यंत, म्हणजेच 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, पुणे, अहिल्यानगर, पालघर, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सोमवारी यलो अलर्ट असून, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांनाही सोमवारी यलो अलर्ट आहे. विदर्भात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, गडचिरोलीत मंगळवारी ऑरेंज अलर्ट आहे. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याच्या अंदाज आहे.या महिनाअखेरपर्यंत, म्हणजेच 30 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. कोकण आव मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे व मध्य पूर्व अरबी समुद्रापासून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ अधिक तीव्र होऊ शकते.
दरम्यान, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून, उपनगर व जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह बरसलेल्या पावसामुळे काही वेळासाठी रस्ते जलमय झाले होते. सुट्टी असल्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसाने धांदल उडाली असून पुढील दोन दिवस आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस कोसळेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

