जामखेड: जामखेड (Jamkhed) तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होवून जागेवरच मृत्यु झाला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यु (father and son died)झाला असल्याचे ग्रामस्थांन कडून सांगण्यात येत आहे.
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब शिकारे (वय 42) व त्यांचा मुलगा महेश शिकारे (वय 15) वर्षे हे दोघे बाप-लेक उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते. मात्र मागिल पंधरा दिवसांपूर्वी खर्डा परीसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन अनेक विजेचे पोल पडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. त्या तारांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.
बाळगव्हाण येथील घटना घडलेल्या शेतात देखील विजेच्या तारांचे पोल खाली पडल्यामुळे या विजेच्या तारा उसाच्या शेतात पडल्या होत्या. मात्र याठिकाणी मुलगा खत टाकण्यासाठी गेला तेंव्हा त्याला खाली पडलेल्या तारा न दिसल्याने या तारांना चिकटून त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे वडील काकासाहेब शिकारे हे पाठीमागून शेतात आले व मुलाला चिकटलेले पाहून ते देखील त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र त्यांनाही या विजेच्या तारांचा झटका बसल्याने त्यांचा झाला. ही घटना काल दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.मात्र रात्री उशिरा वडील आणि मुलगा शेतातून घरी आले नसल्याने रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ हे शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले. यावेळी त्यांना वडील व मुलाचा विद्युत तारांना चिकटून मृत्यू झाला असल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाई करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.