Advertisement

प्रदीप मिश्रांची (Pradip Misra) कथा ऐकण्यासाठी आलेल्या दोन महिलांना गमवावा लागला जीव

प्रजापत्र | Saturday, 14/06/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१४ (प्रतिनिधी)-अत्यंत ढिसाळ नियोजन,जागा मिळविण्यासाठीची वशिलेबाजी आणि इतर कारणांनी कायम चर्चेत राहिलेल्या प्रदीप मिश्रांच्या (Pradip Misra) शिवपुराण कथा सप्ताहा दरम्यान दोन महिलांना आपला जीव गमवावा लागल्याचे आता समोर आले आहे.कथेच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या दिवशी या दोन घटना घडल्याचे समोर आले. 
   बीडच्या चाकरवाडीमध्ये (Chakarwadi) प्रदीप मिश्रांच्या (Pradip Misra) शिवपुराणकथेचे (Shivpuran) आयोजन करण्यात आले होते.त्याची सांगता शनिवारी झाली. प्रदीप मिश्रांची कथा म्हणजे लाखोंची गर्दी हे माहित असतानाही चाकरवाडीमध्ये आयोजकांना त्या तुलनेत नियोजन करता आले नाही.आयोजनात स्थानिकांपेक्षा 'शेठ' च्या मर्जीतल्या लोकांचा भरणा असल्याने नियोजन सातत्याने कोलमडत होते.त्यातच आता कथेच्या दरम्यान कथा ऐकण्यासाठी आलेल्या दोन महिलांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.यामुळे कथेच्या आयोजनाला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
कथेच्या पहिल्याच दिवशी कथा ऐकण्यासाठी आलेल्या चंद्रकला पांडुरंग बंडे (वय-६५ रा.मानवत,जि.परभणी) या  महिलेचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला असल्याचे सांगितले जाते.मात्र ही माहिती बऱ्यापैकी लपविली गेली. तर कथेच्या शेवटच्या दिवशी कथा ऐकून परत निघालेल्या लक्ष्मीबाई बलभीम उकळे (वय-५५,रा.धारूर) या महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने (MH.44.U.4444) ने चाकरवाडी परिसरातच उडविले.यात त्या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून थोड्यावेळात पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.दरम्यान कथा सप्तहादरम्यान झालेले हे भक्तांचे दोन मृत्यु नियोजनावर अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरले आहेत. 

परळीमध्ये झाले होते सुंदर नियोजन
प्रदीप मिश्रांच्या कथेचे गारुड समाजावर मोठ्याप्रमाणावर आहे. त्यांची कथा कोठेही असली तरी राज्यातून आणि राज्याबाहेरून देखील लोक येतात. त्यामुळे आयोजकांना हे सारे लक्षात घेऊन नियोजन करावे लागते.तसे नियोजन काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमध्ये झालेल्या शिवकथे दरम्यान करण्यात आले होते. प्रदीप मिश्रांची कथा आणि ज्योतिर्लिंगाचे भूमी असा योग्य असल्याने त्या ठिकाणी देखील लाखोंची गर्दी होती,मात्र तेथील नियोजनामुळे काही अप्रिय घटना घडल्या नव्हत्या. 

 

Advertisement

Advertisement