बीड दि. २ (प्रतिनिधी ) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आता हालचाली वेग घेत असल्याचे चित्र आहे. जिल्हापरिषद आणि पंचायतसमित्यांसाठी गट गण रचनेची तयारी करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यांसंदर्भाने २०२२ मध्ये करण्यात आलेली गट गण रचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु असून २०१७ च्या सदस्यसंख्येवर आधारित गट गण रचना होईल असे संकेत मिळत आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोहाने या निवडणुकांसंदर्भात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात प्रभाग रचना आणि गट गण रचनेच्या संदर्भाने तयार राहण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. गट गण रचनेचे प्रारूप तयार ठेवण्याचे देखील सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१७ साली ज्या सदस्यसंख्येवर आधारित रचना करण्यात आली त्याच रचनेवर आता पुन्हा गट गण रचना होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
२०२२ च्या प्रभाग रचनेत काय घडले होते ?
२०२२ च्या निवडणुकांसाठी जी प्रभाग रचना आणि गट गण रचना करण्यात आली होती, त्यात २०११ च्या जनगणनेत लोकसंख्येत १० % वाढ झाली असे गृहीत धरून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली होती. जिल्हापरिषदांसाठी पूर्वी किमान ५० आणि कमाल ७५ सदस्य असे सूत्र होते. २०२२ मध्ये ते सूत्र किमान ५५ आणि कमाल ८० असे करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या वाढली होती. बीड जिल्हापरिषदेतही ७ सदस्य वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने ६७ गटांची रचना केली होती. मात्र त्या रचनेआधारे निवडणुकांचं होऊ शकल्या नाहीत.
२०१७ मध्ये असे होते गट
२०२२ च्या रचनेत ६७ जिल्हापरिषद गट प्रस्तावित करण्यात आले होते . आता ते जवळपास बारगळल्यात जमा असून २०१७ च्या संख्येप्रमाणे गट टाचण अपेक्षित आहे. २०१७ साली बीड जिल्हा परिषदेत ६० सदस्य होते. यात गेवराई ९ , बीड ८ , आष्टी ७, परळी, अंबाजोगाई, माजलगाव प्रत्येकी ६, शिरुरकासार ४, पाटोदा, धारूर प्रत्येकी ३ तर वडवणी २ अशी सदस्य संख्या होती.
अनेकांची होणार गोची
२०२२ मध्ये सरकारने सदस्य संख्या वाढविल्यानंतर एकट्या बीड जिल्ह्यात ७ जिल्हापरिषद गट आणि १४ पंचायत समिती गण वाढणार होते, त्यामुळे अनेकांनी आपापल्या सोयीने गट आणि गण बांधणी केली होती. मात्र त्या निवडणुका झाल्याचं नाहीत आणि आता पुन्हा सदस्यसंख्या कमी होणार असेल तर २०१७ सारखेच गट होतील, त्यामुळे नव्याने बांधणी केलेल्या अनेकांची गोची होणार आहे.