Advertisement

वड्याचे तेल वांग्यावर नव्हे.....! तर भांडणाचा राग काढला कोंबड्यांवर.......!

प्रजापत्र | Friday, 08/01/2021
बातमी शेअर करा

नगर दि.८ - शेजाऱ्यांमध्ये वाद असतात, जुनी खुन्नस असते. यातून भांडणे मारामाऱ्याही होतात. ग्रामीण भागात तर हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. मात्र, पारनेर तालुक्यातील कासारे गावात अशाच दोन कुटुंबांच्या वादात कोंबड्यांचा बळी गेला आहे. जुन्या रागातून एका कुटुंबाने शेजाऱ्याच्या कोंबड्यांना विष घालून मारल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

                कासारे (ता.पारनेर) येथील प्रियंका शिवाजी पवार यांनी यासंबंधी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. पवार यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. शेजारी राहणार्‍या व्यक्तींनी पूर्ववैमनस्यातून पिठाच्या गोळ्यात विष टाकून त्यांच्या कोंबड्यांना मारले. पवार कुटुंबीय घरी नसताना हा प्रकार घडला. घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की बऱ्याच कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. निरीक्षण केले असता तेथे काही पिठाच्या गोळ्या सापडल्या. त्यामध्ये विषाचा वास येत होता. त्यामुळे पवार यांना कोंबड्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय आला.शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांवरच त्यांचा संशय होता. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्या, तर त्यांनी हा आरोप फेटाळून उलट पवार यांनाच शिवीगाळ व धमकी दिली. स्थानिक पोलिसांनी दाद न दिल्याने पवार यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे. आज कोंबड्या मारल्या, उद्या आमच्या जीवालाही धोका होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. स्थानिक पोलिसांकडे गेले असता. ‘तुम्ही तुमचे भांडण आपसात मिटून घ्या, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील,’ असा सल्ला पोलिसांनी दिल्याचेही पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. सुमारे आठ वर्षांपासूनच्या भांडणाचा राग शेजाऱ्यांनी असा काढल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. यामध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 हेही वाचा 

Advertisement

Advertisement