Advertisement

राज्यात जोरदार पावसाचा इशारा

प्रजापत्र | Thursday, 09/05/2024
बातमी शेअर करा

 महाराष्ट्रातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. सध्या अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण जाणवत आहे. दरम्यान, राज्यात आजपासून म्हणजे ९ मे ते १५  मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी दिली आहे. राज्यातील कोणत्या विभागात नेमका कधी पाऊस पडले याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

 

 

राज्यात मध्य महाराष्ट्र विभागात तीव्र तापमान वाढीमुळं हवेचे जोडक्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा विभागात जोरदार वळिव पाऊस तर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यातील काही भागात ९ मे ते १५ मे या काळात पाऊस होईल. तसेच मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणीसह संभाजीनगर आणि विदर्भातील काही भागात देखील याच काळात वादळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.सध्या एल निनो कमी होत असून १५ मे पर्यंत पूर्ण प्रभाव कमी होईल. हिंदी महासागरावर मात्र मे महिन्यात iod (इंडियन ओशन डायपोल ) पॉझिटिव्ह परिस्थिती मध्ये येणार आहे याचा परिणाम म्हणून राज्यात आणि देशात मान्सून पूर्व ( वळिव ) पावसाचे प्रमाण मे च्या शेवटी आणि जून सुरुवातीला जास्त राहील असे विजय जायभावे म्हणाले.  

 

 

कोणत्या भागात कधी पडणार पाऊस?
उत्तर महाराष्ट्र ९ मे 
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकमध्ये ९ मे रोजी पावसाची शक्यता आगे. तसेच संभाजीनगर आणि अहमदनगर  भागात देखील पुढील दोन तीन दिवस  गडगडाटी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

 

 

कोकणात कसे असेल हवामान?
कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ होणार असल्याची माहिती विजय जायभावे यांनी दिली आहे.  

 

 

मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?
मध्य महाराष्ट्र ९ मे पासून पुढील दोन ते तीन दिवस पुणे, अहमदनगर, दक्षिण सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होईल. तसेच दिवसाचे तापमान जास्त राहिल. १० मे ते १७ मे पर्यंत काही भागात स्थानिक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता विजय जायभावे यांनी वर्तवली आहे.  

 

 

मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, धराशिव भागात जोरदार वळिव पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे. १० मे पासून ते १६ मे पर्यंत अनेक भागात पाऊस सरु राहील. १६ ते १७ मे या काळात देखील काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता विजय जायभावे यांनी व्यक्त केली आहे.

 

 

विदर्भात तापमानात वाढ होणार
विदर्भात पुढील एक आठवडा नागपूर, गोंदिया,  वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि अकोल्यात तीव्र तापमान वाढ कायम राहील. तसेच काही ठिकाणी पावसाचा जोर  देखील पाहायला मिळेल. 

Advertisement

Advertisement