गेवराई - तालुक्यातील राक्षसभुवन शिवारातील 13 शेतक-याच्या उजव्या कालव्यावर लावलेल्या 3 एच.पी व 5 एच .पी व 7.5 एच.पी च्या 18 विद्युत मोटारी मंगळवार रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे शेतक-याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील गैबीनगर तांडा व राक्षसभुवन येथील गजानन आडे, कैलास राठोड, अंकुश चव्हाण, अशोक चव्हाण, भगवान चव्हाण, ज्ञानदेव चव्हाण, भानुदास चव्हाण, आसाराम चव्हाण, उत्तम चव्हाण सर्व राहणार गैबीनगर तांडा व रमेश पाठक, डाॅ.नागेश पाठक, रमेश मोरे राहणार राक्षसभुवन या 13 शेतकऱ्यांनी राक्षसभुवन शिवारातील उजव्या कालव्यावर शेती च्या पाण्यासाठी लावलेल्या 3 एच.पी,5 एच.पी,7.5 एच.पी च्या विद्युत मोटारी मंगळवार रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असुन त्यामुळे 13 शेतक-याचे जवळ पास लाखो रूपयांच्या विद्युत मोटारी चोरी गेल्या आहेत. याची तक्रार देण्यासाठी या भागातील शेतकरी चकलांबा पोलिस ठाण्यात गेले आहेत.मात्र उशिरा पर्यंत चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या आधी देखील येथील शेतकऱ्यांचे वायर, स्टार्टर, पेटी असे साहित्य चोरी गेलेले आहे.