आष्टी दि.११(प्रतिनिधी): तालुक्यातील कडा शहरामध्ये चोरट्यांच्या एका अजब आणि अत्यंत धाडसी टोळीने चक्क मुक्या जनावरांना टार्गेट करत लाखो रुपयांचे पशुधन लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भल्या पहाटेच्या सुमारास एका कमर्शियल पिकअप जीपमधून आलेल्या तब्बल ६ जणांच्या सराईत टोळीने शहरातील रस्त्यांवरून चक्क ८० पाळीव वराहांची (डुकरांची) चोरी केली. हा संपूर्ण चोरीचा थरार आणि चोरट्यांची टोळी कडा शहरातील मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांमध्ये हुबेहूब कैद झाली आहे. या अनोख्या आणि मोठ्या चोरीच्या प्रकारामुळे कडा शहरासह संपूर्ण आष्टी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहितीनुसार, कडा शहरातील रहिवासी नितीन गायकवाड यांच्या मालकीचे अनेक पाळीव वराह आहेत. या वराहांच्या पालनातूनच गायकवाड हे आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात. ७ जून रोजी मध्यरात्री २ ते अडीच वाजेच्या सुमारास, जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होते, तेव्हा एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी कडा शहरात दाखल झाली. गाडी थांबवून त्यातून ६ धडधाकट तरुण खाली उतरले. त्यांनी अत्यंत शिताफीने रस्त्यावरील आणि आजूबाजूला बसलेल्या तब्बल ८० वराहांना पकडून एकापाठोपाठ एक दोरीच्या सहाय्याने पिकअप गाडीच्या मागच्या बाजूला कोंबले आणि अवघ्या अर्ध्या तासात तिथून धूम ठोकली.सकाळी नेहमीप्रमाणे वराहांचा कळप गायब असल्याचे नितीन गायकवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता, काही दुकानांच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तेव्हा एका पिकअप गाडीत ६ जण वराह कोंबून पळवून नेत असल्याचे विदारक चित्र समोर आले. हे वराह चोर कोण होते, त्यांनी ही धाडसी चोरी कोणत्या विशिष्ट उद्देशाने केली असावी, एवढ्या मोठ्या संख्येने हे वराह कुठे नेले आणि कशासाठी नेले, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या वराहांची विक्री मांस विक्री करणाऱ्या टोळ्यांना करण्यासाठी किंवा परराज्यात तस्करी करण्यासाठी ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

