Advertisement

अचानक जागृत झालेल्या व्यक्तीने जिल्ह्यात संभ्रम निर्माण करू नये-धनंजय मुंडे

प्रजापत्र | Friday, 16/04/2021
बातमी शेअर करा

 परळी: बीडमधील सत्ताधारी फक्त माफियांचं हित साधण्यात गुंतल्यामुळं जिल्ह्यात करोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बोचऱ्या शब्दांत पण मुद्देसूद उत्तर दिलं आहे. जिल्ह्यातील लस उपलब्धतेची नेमकी माहिती देतानाच धनंजय मुंडे यांनी पंकजांना सणसणीत टोला हाणला आहे.पंकजा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यातील करोना परिस्थितीकडं लक्ष देण्याची विनंती केली होती. तसंच, धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकाही केली होती. पंकजा यांच्या या टीकेला धनंजय मुंडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांना टॅगही केलं आहे.

 

आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे म्हणतात...

अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या दोन लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत, त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या आहे. हे काहींना माहीत नसेल.

बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३,२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्याला अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो.

 

 

जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३,२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!

 

 

राजकारण जरूर करा, पण...

'जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १,४९,४७३ नागरिकांना पहिले तर १९,७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको,' असं धनंजय मुंडे यांनी सुनावलं आहे.
 

Advertisement

Advertisement