Advertisement

अवघ्या दहा दिवसात अंबाजोगाईत दुसरा खून

प्रजापत्र | Thursday, 11/03/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.११ - शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (दि.११) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार करून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
                    नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी पहाटे १२.३० वाजताचा सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याचा काही व्यक्तींसोबत वाद झाला. या वादातून झालेल्या मारहाणीत डोक्याला गंभीर इजा होऊन नितीनचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
                 घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ घटनेमागच्या कारणांचा शोध घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तर, मुख्य संशयित फरार झाला असून त्याचा कसून तपास सुरू आहे. मागील महिन्यात नितीनचा या मुख्य संशयितासोबत वाद झाला होता, त्यातून हा प्रकार घडला असावा अशी माहिती सुत्रांनी दिली.

                   दरम्यान दहा दिवसापूर्वी शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात गणेश मोरे याचा भर रस्त्यावर निर्घुण खून करण्यात आला होता. या घटनेच्या धक्क्यातून शहर सावरत असतानाच बुधवारी पहाटे भांडणातून पुन्हा एक खून झाला. एरवी शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहराच्या प्रतिमेवर या दोन घटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Advertisement

Advertisement