Advertisement

तेंव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही ? काँग्रेस चा शिवसेनेवर पलटवार.....!

प्रजापत्र | Sunday, 17/01/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१७ - औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेसमध्ये ‘सामना’ रंगू लागला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलरवादावरून काँग्रेसला टोले लगावले. “औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत,” असं म्हणत राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. या टीकेनंतर काँग्रेसनंही भात्यातून बाण काढत शिवसेनेच्या दिशेनं रोखला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला लक्ष्य करत काही सवाल केले आहेत.

                  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. “औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?,” असा सवाल थोरात यांनी शिवसेना-भाजपाला केला आहे.

               “गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे,” असं थोरात म्हणाले.

Advertisement

Advertisement