गेवराई दि.१३ (प्रतिनिधी) - 21 दिवसापुर्वी लग्न झालेल्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि.7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री (निपानी जवळका तांडा ता.गेवराई) येथे घडली होती. सदरील तरूणाच्या मृत्यू प्रकरणी आईने पोलिसात तक्रार दिली आहे.पती पसंत नसल्याने पत्नीनेच पतीचा झोपेत गळा आवळून खुन केल्याची तक्रार मयत तरूणाच्या आईने पोलीसात दिली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात पत्नीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील निपानी जवळका तांडा येथील पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22) या नवविवाहीत तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दि.7 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. दि.8 नोव्हेंबर रोजी तरूणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी करून या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान तरूणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आईने पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी मयत पांडुरंग चव्हाण याची आई निलाबाई चव्हाण यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी पांडुरंगचे लग्न शितल हिच्यासोबत पवळाचीवाडी येथे झाले होते. लग्न झाल्यापासून शितल ही पांडुरंगला नेहमी तु मला पसंत नाहीस, आवडत नाहीत असे म्हणून राग-राग करीत असे. त्याचाच राग मनात धरून शितलने झोपेत असलेल्या पती पांडुरंग चव्हाणचा गळा आवळुन खुन केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार शितल पांडुरंग चव्हाण हिच्याविरूध्द गेवराई पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास सपोनि साबळे हे करीत आहेत.